पावसाळ्यात ह्या चुका करू नका नाहीतर......
पावसाळा ऋतू सर्वांना हवाहवासा वाटणारा ऋतू आहे.अगदी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच या ऋतूचा आस्वाद घेतात. पावसाळा म्हटले कि मुसळधार पाऊस,मस्त गरम चहा आणि गरमागरम भजी, बटाटा वडे अहाहा....
काहींना पावसात चिंब भिजायला आवडते तर काहींना नुसता पाऊस पाहायला आणि त्याचा आवाज ऐकायला आवडतो.लहान मुले तर पावसाळा खूप एन्जॉय करतात. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात उड्या मारणे,ओढे,झरे यात कागदाच्या होड्या बनवून सोडणे,छत्री घेऊन उगाच फेरफटका मारणे,एकमेकांवर पाणी उडवणे,चिखलात खेळणे,पावसात भिजणे हे आणि बराच काही... नुसती धम्माल.
वातावरणातील बदलामुळे या गोष्टी होणे साहजिकच आहे. परंतु या गोष्टी कितपत योग्य आहेत त्यामुळे फायदा होतो कि तोटा ते आपण आज पाहुयात.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. पावसाळा कसा आल्हाददायक आहे ते आपण पहिले परंतु या ऋतूत खूप खबरदारी घ्यावी लागते नाहीतर तो आरोग्याचे नुकसानही करू शकतो. पाऊस म्हणजे चिकचिक,चिखल, ओले कपडे,सर्दी- खोकला,ताप हे आणि बराच काही....
पावसाळ्यात वातावरण दमट आणि ओलसर असते त्यामुळे पदार्थ लवकर खराब होतात.तसेच कपडे व्यवस्थित सुकत नसल्याने त्वचा रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाच्या पाण्यात सर्व घाण वाहून नेली जाते. त्यामुळे पाणी आणि अन्न दूषित होते आणि संक्रमणाचा धोका वाढतो.डासांमुळे डेंग्यू,मलेरिया सारखे आजार पसरतात.
या सर्वांचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. म्हणून पावसाळ्यात स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही टिप्स....
काय खावे?
- पाणी-: ऋतु कोणताही असो नेहमी हायड्रेटेड राहणे उत्तम होय .दिवसातून २-३लिटर पाणी गाळून आणि उकळून योग्य वेळी आणि योग्य रीतीने पिणे फायद्याचं ठरेल.जेणे करून शरीरातील टॉक्सिन्स मल आणि मूत्रद्वारे शरीरातून बाहेर टाकले जातील.
- फळे आणि भाज्या -: या काळात क जीवनसत्व असलेली फळे उदा.लिंबू, पपई, टोमॅटो,संत्री स्वच्छ धुवून खावीत.त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.स्वच्छ धुवून शिजवलेल्या हिरव्या भाज्यांचे सेवन नक्की करा त्यामुळे तुम्हाला इतर जीवनसत्वे आणि फायबर पुरेशा प्रमाणात मिळतील. तसेच भाज्यांचे सूप पिणे केव्हाही उत्तम.
- हळदीयुक्त दूध-: हळद हि जंतुनाशक असल्याने दुधात घालून लहान मुलांना किंवा वयोवृद्धांना दिल्यास त्याचा फायदा होईल.
- मसाला किंवा आल्याचा चहा -:चहा हे बहुतेकांचे आवडते पेय आहे.आणि प्रत्येक घरात घेतले जाते.त्यामुळे रोजच्या चहात आले ठेचून टाकले असता चव आणि आरोग्य दोन्ही सुधारते.तसेच मिरी,लवंग,वेलची यासारखे मसाल्याचे पदार्थ टाकून कोरा चहा पिणे उत्तम ठरेल. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो . सर्दी खोकला ताप यांसारख्या आजारांमध्येही लवकर बरे वाटण्यास मदत होते .
काय टाळावे?
- उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा -: या पदार्थांवर माश्या बसून हे पदार्थ संक्रमित होतात आणि असे संक्रमित पदार्थ खाल्ल्याने संक्रमणाचा धोका वाढून टायफॉईड, गॅस्ट्रो यांसारखे आजार बळावतात. तसेच हे पदार्थ पचायला जड असतात त्यामुळे पोटदुखी,गॅस सारख्या त्रासांना बळी पडू शकता.
- कार्बोनेटेड आणि थंड पेये-: वातावरण थंड असल्या कारणाने हि पेये सर्दी खोकला कफ याना आमंत्रण देऊ शकतात .
- मांसाहार कमी करा -: या काळात पाणी दूषित असल्याने मासे खाणे धोकादायक होऊ शकते. तसेच इतर मांसाहार सुद्धा पचायला जड असल्या कारणाने पूर्ण शिजवलेल्या मांसाहार पदार्थांचे कमी सेवन करणे फायद्याचे ठरेल.
- पालेभाज्या -: पावसाळ्यात पालेभाज्या तसेच कोबी ,फ्लॉवर यांसारख्या भाज्या खाणे टाळावे कारण दूषित पाण्यामुळे त्या संक्रमित होऊ शकतात.
अशा पद्धतीने थोडी खबरदारी घ्या आणि पाऊस एन्जॉय करा.


Comments
Post a Comment